युरोपियनांचे भारतात आगमन
०१. वास्को-द-गामाचे कालिकत बंदरातील पहिले पाऊल म्हणजेच युरोपियनांच्या व्यापाराला झालेली सुरुवात म्हणावी लागेल. सर्वप्रथम व्यापाराच्या निमित्ताने पोर्तुगीज आले. त्यानंतर त्यांच्या पाठोपाठ डच, इंग्रज, फ्रेच, इ. व्यापारी आले व ते भारतात व्यापार करु लागले. या व्यापारातून त्यांच्यात सत्ता स्पर्धेला सुरुवात झाली. त्यात अंतिम विजय इंग्रजांना मिळाला व ते सत्तास्पर्धेत यशस्वी झाले.
०२. पूर्वी भारतातील माल इराणचे आखात - कॉन्स्टॅटिनोपल (इस्तंबूल) - इटली या खुष्कीच्या मार्गाने युरोपियन देशात पाठवला जात असे. परंतु १४५३ मध्ये तुर्कानी कॉन्स्टॅटिनोपल हे शहर जिंकुन घेतल्यामुळे युरोपियनांचा भारताशी चालणारा व्यापारच बंद झाला. कारण तुर्कानी युरोपियन व्यापाऱ्यांचा मार्गच अडवून धरला.
०३. भारताशी सुरु असलेला व्यापार असा अचानक बंद पडल्यामुळे नेहमी लागणारा व भारतातून येणारा माल दुसऱ्या राष्ट्रांमध्ये मिळणे अशक्य होते. या गरजेतूनच युरोपियन व्यापारी व राज्यकर्ते भारताचा शोध समुद्रमार्गे लागतो का याचा प्रयत्न करु लागले.
०४. या गरजेतूनच स्पॅनिश राजा राणीच्या मदतीने कोलंबस या धाडसी खलाशाने अटलांटिक महासागर पार करुन भारताकडे जाणाऱ्या मार्गाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. त्याच्या या प्रयत्नामुळे तो १४९२ मध्ये अमेरिकेला जाऊन पोहचला म्हणजे त्यास अमेरिका हा नवीन खंड सापडला.
०५. पुढे लवकरच पोर्तुगाल या देशास भारताकडे जाणारा मार्ग शोधून काढण्यास यश मिळाले. वास्को-द-गामा हा पोर्तुगीज प्रवासी आफ़्रिकेच्या दक्षिण टोकाला वळसा घालून २३ मे १४९८ रोजी कालिकत बंदरात येऊन पोहोचला. वास्को-द-गामाचे कालिकत बंदरातील पहिले पाऊल म्हणजे युरोपियन संस्कृतीचे भारतीय किनाऱ्यावरील पहिले पाऊल होते.
०६. पण त्या वेळी भारतात कार्यरत असणार्या डच ईस्ट इडिया कंपनीकडून व फ्रेंच ईस्ट इंडिया कंपनीकडून जबरदस्त स्पर्धेला तोंड द्यावे लागल्यामुळे ब्रिटिश कंपनीच्या व्यापारावर व नफ्यावर मर्यादा आली. त्याला पर्याय व सर्वोत्तम मार्ग म्हणजे भारतीय व्यापार क्षेत्रातून या स्पर्धेत कंपन्यांना समाप्त करणे हा होता.
०७. भारतात व्यापार करण्याच्या निमित्ताने आलेल्या पोर्तुगीजांनी व्यापाराबरोबर राज्यविस्ताराचे व धर्मप्रसाराचे धोरण स्वीकारले म्हणून त्यांच्या सत्तेचा विस्तार भारतात फारसा होऊ शकला नाही. याच सुमारास युरोपात इंग्लडने हॉलंडचा पराभव केल्यामुळे भारतातील डच, व्यापारी निष्प्रभ झाले.