होमरुल चळवळ - डॉ. ॲनी बेझंट, लोकमान्य टिळक | Homerule Movement
होमरुल चळवळीची पार्श्वभुमी भारतीय स्वातंत्र्य चळवळीच्या इतिहासात ‘होमरुल चळवळ’ ही एक वैशिष्ट्यपूर्ण चळवळ मानली जाते. सन १९०६ मध्ये मुस्लीम लीगची स्थापना झाली. राष्ट्रीय सभेपासून दूर राहण्यातच आपला स्वार्थ आहे, असे मुस्लिम नेत्यांना वाटत होते. सन १९०९ मध्ये त्यांना विभक्त मतदारसंघ मिळाल्यामुळे ब्रिटिश आपले तारक आहेत असे वाटू लागले होते. परंतु ब्रिटिश सरकारने सन १९११ मध्ये बंगालची फाळणी रद्द केली, स्वाभाविकच ब्रिटिशांनी आपले स्वप्न भंग केला आहे असे मुस्लिम नेत्यांना वाटू लागले. सन १९१४ मध्ये लोकमान्य टिळकांची मंडालेच्या तुरुंगातून सुटका झाली. राष्ट्रीय चळवळीला आलेली मरगळ झटकून टाकण्यासाठी ती पुन्हा सक्रीय करण्याचा निर्णय घेतला. या काळात मवाळ व जहाल यांच्यातील मतभेद दूर करण्यात नेत्यांना यश आलेले होते. ब्रिटिशांच्या धोरणावर नाराज असलेल्या मुस्लिम लीगनेही राष्ट्रीय सभेला सहकार्य करण्याचे मान्य केले होते. अशा पार्श्वभूमीवर होमरुल चळवळीचा निर्णय घेण्यात आला. होमरुल चळवळ भारतीय स्वातंत्र्य चळवळीस नवचैतन्य निर्माण करण्याच्या लोकमान्य टिळकांच्या विचारांचे दृश्य स्वरुप म्हणजे होमरुल चळवळ होय.